top of page

मेरी माटी मेरा देश' अर्थात ‘माझी माती माझा देश’ अभियानाचा क्रांती मैदानावर मुख्य सोहळा

मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार व मान्यवरांच्या उपस्थितीत ‘शिलाफलकम’चे अनावरण, वृक्षारोपण

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात केंद्र सरकारच्या निर्देशानुसार ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अभियान गत वर्षभरात राबविण्यात आले. या अभियानाचा समारोप ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ या अभियानाने होत आहे. बुधवार, दिनांक ९ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ९ वाजता मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदान येथे राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या मुख्य उपस्थितीत या अभियानाचा मुख्य सोहळा होणार आहे. तसेच ऑगस्ट क्रांती मैदानातील पुरातन वास्तुजतनाच्या विविध कामांचे लोकार्पणही या समारंभात होणार आहे. या सोहळ्यास सन्माननीय मुख्य अतिथी म्हणून वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री श्री. दीपक केसरकर, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री तथा स्थानिक आमदार श्री. मंगल प्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक खासदार श्री. अरविंद सावंत, आमदार श्री. सुनील शिंदे, आमदार श्री. राजहंस सिंह तसेच राज्याचे मुख्य सचिव श्री. मनोज सौनिक, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री. इकबाल सिंह चहल यांचेसह विविध लोकप्रतिनिधी, मान्यवर, अधिकारी आदींची सोहळ्यास उपस्थिती राहणार आहे. बुधवार, दिनांक ९ ऑगस्ट २०२३ रोजी ऑगस्ट क्रांती मैदानावर आयोजित मुख्य समारंभात केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या विहित नमुन्यातील ‘शिलाफलकम’चे अनावरण केले जाईल. तसेच याच ठिकाणी 'वसुधा वंदन' अंतर्गत वृक्षारोपण करण्यात येईल. ऑगस्ट क्रांती मैदान व सभोवतालच्या परिसराच्या पुरातन वारशांचे जतन करण्याचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पुरातन वास्तू जतन कक्षातर्फे करण्यात आले आहे. यामध्ये मैदानातील कुंपणभिंती उभारणे, मातीचे पदपथ तयार करणे, मध्य पदपथावर बेसाल्ट दगडाची फरसबंदी, मैदानालगतचे पदपथ मोकळे करणे आणि तेथील दृष्यमानता वाढविणे, भित्तिशिल्पे साकारणे इत्यादी कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या सर्व कामांचेही लोकार्पण या समारंभात होणार आहे.'मेरी माटी मेरा देश' अर्थात ‘माझी माती, माझा देश’ या अभियानाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने देखील मुंबईत दिनांक ९ ते १४ ऑगस्टदरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानामध्ये मुंबईकर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, तसेच यंदा देखील दिनांक १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान प्रत्येक घरी राष्ट्रध्वज तिरंगा सन्मानपूर्वक फडकवावा, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. इकबाल सिंह चहल यांनी केले आहे.

Comments


bottom of page