मुंबई, २८ ऑगस्ट २०२४ - राज्यभरातील हजारो सरपंचांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन सुरु केले आहे. त्यांच्या मागण्या न्याय्य आहेत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज सांगितले. भाजप-शिवसेना महायुती सरकार त्यांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याची टीका करत, महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर त्यांच्या सर्व प्रलंबित मागण्या मान्य करणार, असे त्यांनी स्पष्ट केले.
आझाद मैदानात अखिल भारतीय सरपंच परिषद, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालक आणि ग्रामरोजगार सेवक यांच्या आंदोलनास काँग्रेसचे नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भेट दिली.
यावेळी बोलताना नाना पटोले यांनी सांगितले की, संगणक परिचालकांच्या प्रश्नी भाजप-युती सरकारची भूमिका संशयास्पद आहे. संगणक परिचालकांच्या मानधनातही भ्रष्टाचार घुसला आहे. संगणक परिचालकांची नेमणूक व मानधनाचे प्रश्न लवकरात लवकर सोडवले पाहिजेत. या अनुभवी संगणक परिचालकांना कमी वेतनात काम करावे लागते आणि त्यांना काढून दुसऱ्याची नेमणूक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ग्रामपंचायतीच्या पैशांचा अधिकार आहे, पण सरकार पैसे देत नाही. महायुती सरकार आता काही दिवसांचेच आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर तुम्हाला न्याय मिळेल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
Comments