मुंबई, ६ सप्टेंबर २०२४: वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या सण-उत्सवाचा रंग फिका झाला आहे. भाज्या, धान्य, पेट्रोल, डिझेल आणि गॅस यांच्या किंमती गगनाला भिडल्याने घर चालवणे अवघड झाले आहे, अशी परिस्थिती आहे. महिलांच्या समस्यांना वाचा फोडत महिला काँग्रेसने भाजपा सरकारविरोधात राज्यभर ‘खर्चे पे चर्चा’ अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानाची सुरुवात मुंबईतील वर्सोवा आणि चेंबूर विधानसभा मतदारसंघातून झाली आहे.
महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा यांनी पत्रकार परिषदेत भाजपा सरकारवर कडाडून टीका केली. त्या म्हणाल्या, "महागाईमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले असून, सण-उत्सवाची खरी मजा हरवली आहे. निवडणुकीच्या तोंडावर महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन भाजप सरकार महिलांची फसवणूक करत आहे."
लांबा यांनी स्पष्ट केले की, काँग्रेस सरकार सत्तेत आल्यास प्रत्येक गरीब महिलेच्या खात्यात दरवर्षी १ लाख रुपये जमा करण्यात येतील, अशी घोषणा केली होती. तेलंगणासह कर्नाटक व हिमाचल प्रदेशात महिलांना आर्थिक सहाय्य दिले जात आहे. मात्र महाराष्ट्रात भाजपा सरकारने निवडणुकीच्या तोंडावर ‘लाडकी बहीण’ योजना जाहीर केली, जी महिलांची फसवणूक करणारी आहे, असा आरोप त्यांनी केला.
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनीही महागाई व महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर भाजप सरकारला धारेवर धरले. त्या म्हणाल्या, "महागाईमुळे महिलांना घर चालवणे कठीण झाले आहे, तर महिलांची सुरक्षा देखील धोक्यात आहे. महिला काँग्रेस महागाईविरोधात आवाज उठवेल आणि प्रत्येक घरापर्यंत ‘खर्चे पे चर्चा’ पोहोचवेल."
महिला काँग्रेसच्या या अभियानाला राज्यभरातून पाठिंबा मिळत असून २८८ मतदारसंघांमध्ये हे अभियान राबवले जाणार आहे.
Comments