top of page

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले


मुंबई, ४ ऑक्टोबर: मराठीसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचे आभार व्यक्त केले आहेत. त्यांनी सांगितले की आजचा हा दिवस महाराष्ट्र आणि मराठी भाषेसाठी ऐतिहासिक ठरेल.



राज्यपालांनी संत ज्ञानेश्वर, संत चक्रधर स्वामी, जगद्गुरू संत तुकाराम यांसारख्या संतांच्या भाषेला हा दर्जा मिळाल्याबद्दल अभिमान व्यक्त केला. या संत आणि समाजसुधारकांच्या भाषेला मिळालेला हा सन्मान महत्त्वाचा आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, लोकमान्य टिळक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि असंख्य स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक यांच्या मराठी भाषेचा सन्मान सर्वांसाठी अभिमानास्पद आहे, असे त्यांनी सांगितले.



राज्यपालांनी पाली, प्राकृत, बंगाली आणि आसामी या भाषांनाही अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी विश्वास व्यक्त केला की या निर्णयामुळे अधिकाधिक लोक, विशेषत: युवक आणि लहान मुले, मराठी शिकतील, बोलतील, लिहितील आणि मराठीला जागतिक भाषा बनवण्यासाठी प्रयत्न करतील.

महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेच्यावतीने राज्यपाल राधाकृष्णन यांनी प्रधानमंत्री मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत आणि जगभरातील सर्व मराठी भाषिकांचे अभिनंदन केले आहे.


Comments


bottom of page