मुंबई, २9 ऑगस्ट: मालवण तालुक्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेमागील कारणे शोधण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीत स्थापत्य अभियंते, आयआयटी तज्ञ, आणि नौदलाचे अधिकारी यांचा समावेश असणार आहे. पुतळा कोसळण्यामागील कारणांची सखोल तपासणी करून जबाबदारी निश्चित करणे हे या समितीचे मुख्य उद्दिष्ट असेल.
नव्याने उभारण्यात येणाऱ्या पुतळ्यासाठी देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी विशेष तज्ञांची समिती नेमण्याचे निर्देश दिले आहेत. या समितीत देशातील नामांकित शिल्पकार, स्थापत्य अभियंते, आणि नौदलाचे अधिकारी यांचा समावेश असेल. सार्वजनिक बांधकाम विभागाला हे निर्देश दिले गेले आहेत की, छत्रपती शिवाजी महाराजांचा नव्याने उभारला जाणारा पुतळा त्यांच्या कर्तृत्वाला साजेसा आणि भव्य असावा.
या संदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी वर्षा येथे एक बैठक घेतली होती. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, व्हाईस ऍडमिरल अजय कोचर, रियर ऍडमिरल मनीष चढ्ढा, आणि शिल्पकार राम सुतार आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे यांनी या घटनेला दुर्दैवी म्हणून संबोधले आहे आणि शिवभक्तांच्या भावना तीव्र असल्याचे म्हटले आहे. भविष्यात अशी घटना पुन्हा होऊ नये याची पूर्ण काळजी घेतली जाईल. शिवरायांचा पुतळा त्यांच्या लौकिकाला साजेसा उभारण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींचा विचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. त्यांनी हे देखील स्पष्ट केले की, या उपक्रमासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही.
تعليقات