मालवण, २६ ऑगस्ट २०२४ - राज्याच्या राजकारणात मोठा गाजावाजा झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन नुकतेच ४ डिसेंबर २०२३ रोजी नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. मात्र, आज दुपारी मालवण येथील राजकोट येथे उभारलेला हा पुतळा अचानक कोसळला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, “भाजपाच्या नेत्यांनी नेहमीच राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर केला, आणि जनतेच्या भावनांशी खेळ करत मते मिळवली. मात्र, सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महाराष्ट्राचा अपमान केला आहे.”
लोंढे यांनी पुढे असेही नमूद केले की, “निकृष्ट बांधकामामुळेच हा पुतळा कोसळला आहे. महाराजांच्या पुतळ्याच्या कामातही भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना महाराष्ट्राची जनता कधीच माफ करणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला कलंक लावणाऱ्या या लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.”
या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने तातडीने तपास सुरू केला असून, दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, या घटनेने महाराष्ट्रातील जनतेच्या मनात भाजपाच्या सरकारविरोधात नाराजी निर्माण झाली आहे.
Comentarios